पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांना काेणताच पर्याय राहणार नाही, त्यांना त्यांचा पक्ष काॅंग्रेस पक्षातच विलीन करावा लागेल, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांच्या “संकल्पपत्र’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने ते बाेलत हाेते. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, विजय साेनवणे, भाजपचे मतदारसंघ प्रभारी श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे, गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित हाेते.
शरद पवार यांनी “निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षात समाविष्ट हाेतील’ असे विधान केले हाेते. यासंदर्भात विचारले असता, बावनकुळे म्हणाले “पवार यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा पक्ष हा काॅंग्रेस मध्ये ते विलीन करू शकतात. चार जूनला निकाल लागल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे हे निराश झालेले दिसतील.’
पैसे वाटप केल्याच्या आरोपांत तथ्य नाही
भाजपने रोख्यातून जमा केलेले पैसे निवडणुकीत वाटल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्याचे बावनकुळे यांनी खंडन केले. या आरोपात काही दम नाही. रोख्यांच्या खर्चाचा हिशेब आयकर विभागाला द्यावा लागतो. पैसे वाटपाची संस्कृती कॉंग्रेसची आहे.
त्यामुळे त्यांना तसे वाटले असेल, आमच्याबाजूने असे काहीच झाले नाही, असे बावनकुळे म्हणाले. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राेहीत पवार यांनी केलेल्या पैसे वाटपासंदर्भातील आरोपही बावनकुळे यांनी फेटाळून लावले. पराभव दिसू लागल्याने विराेधकांकडून आता पैसे वाटप, ईव्हीएमची तक्रार अशा गोष्टी केल्या जात आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांचे आणखी मुद्दे
– राज ठाकरे महायुतीत आल्यामुळे उद्धव आणि आदित्य ठाकरे नाराज
– मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु राहते, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीच्या आकड्यात फरक पडतो. त्यामुळे निश्चित आकडेवारी उशिरा समजते.
– विकासावर बाेलण्यापेक्षा विराेधक हे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.