पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुणे लोकसभा मतदार संघासाठीचे “विकसित भारत…विकसित पुणे’ हे संकल्पपत्र शहर भाजपने जाहीर केले. त्याचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
यावेळी उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे नाना भानगिरे, मनसेचे साईनाथ बाबर आणि बाबू वागसकर, संजय आल्हाट, भरत लगड, शैलेश चव्हाण, सचिन खरात, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
“पुणेरी’पणाला धक्का लागता कामा नये, ही पुणेकरांची भावना आहे. पुण्याचे पर्यावरण, पुण्याची हवा टिकली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक सुधारली पाहिजे. नदी सुधार, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात नव्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. उद्योग-रोजगार वाढले पाहिजेत.
व्यापारी-व्यावसायिकांचे व्यवहार सुलभ झाले पाहिजेत, या पुणेकरांच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मोहोळ यांनी यावेळी दिले. तसेच वर्षाचे ३६५ दिवस चोवीस तास उपलब्ध राहीन, असेही आश्वासन मोहोळ यांनी दिले आहे. तसेच शहरातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही यावेळी मोहोळ यांनी सांगितले.
संकल्पपत्रातील ठळक बाबी….
– इलेक्ट्रिक बसेसची संख्या २०३० पर्यंत ३,००० वर नेणार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार
– मेट्रोचे जाळे वाढवणार
– पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पाठपुरावा करणार, लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवणार
– रिंग रोड पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार
– नदीसुधार आणि मैला पाणी शुद्धीकरणाला प्राधान्य देणार
– स्वच्छ शहर म्हणून लौकिक मिळवून देणार, कचरामुक्त शहर करणार
– समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार
– पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार.