नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह 10 विरोधी पक्षांच्या 15 खासदारांना गुरूवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शेतकरी आंदोलकांच्या भेटीविनाच त्या खासदारांना परतावे लागले.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनातील महत्वाच्या स्थळांमध्ये गाझीपूर सीमेचाही समावेश आहे. तिथे जाऊन विरोधी पक्षांचे खासदार शेतकऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडथळे ओलांडून आंदोलन स्थळी जाण्यास मज्जाव केला.
संबंधित खासदारांमध्ये एसएडीच्या हरसिम्रत कौर बादल, तृणमूल कॉंग्रेसचे सौगत रॉय आणि द्रमुकच्या कनिमोळी आदींचा समावेश होता. शेतकरी आंदोलकांना भेटू न देण्यात आल्याने हरसिम्रत आणि सुप्रिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
खासदारांनाही शेतकऱ्यांच्या भेटीपासून रोखणे हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, असे हरसिम्रत यांनी म्हटले. तर, आम्हाला शेतकरी आंदोलकांना भेटू दिले गेले नाही. गाझीपूर सीमेचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला, अशी तीव्र प्रतिक्रिया सुप्रिया यांनी दिली.