जंगीपूर – भाजपने समान नागरी कायद्याचा विषय केवळ राजकीय लाभासाठीच वापरला आहे, पण या कायद्याचा हिंदुंना काहीही लाभ मिळणार नाही, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. (“Uniform Civil Law is of no use to Hindus” – mamata banerjee)
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल जंगीपूर मतदारसंघातील एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच भाजपचा पराभव स्पष्ट झाल्याने त्यांना बॅकफूटवर जावे लागले असून त्यांनी ही निवडणूक आता भलत्याच विषयाकडे नेली आहे.
जेव्हाही निवडणुका होतात, तेव्हा ते जातीय तणाव वाढवण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करतात. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याचा विषय लावून धरला आहे. त्यातून ते एका विशिष्ट समुदाया विषयी अपप्रचार करीत आहेत. हा केवळ एक राजकीय दांभिकपणा असून समान नागरी कायद्याचा हिंदुंना कसलाही लाभ होणार नाही.
त्या म्हणाल्या की, पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची पद्धत आणि टक्केवारी पाहिल्यानंतर, आम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकतो की भाजपचा पराभव झाला आहे. उर्वरित पाच टप्प्यातही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. भाजपमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे.