नवी दिल्ली – ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान 20 ते 30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नसून हे आंदोलन हिंसक झाल्यास त्याला केंद्र सरकारच जबाबदार असेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
शरद पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान 20 ते 30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही ही खेदाची बाब आहे. आज जे शांततेत आंदोलन सुरू आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल.
हे सरकार संवेदनशील नाही. विरोधी पक्षातील नेते आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घ्यायला जाणार होते. मात्र त्यांना भेटू दिले गेले नाही. शेतकऱ्यांना जे अडथळे निर्माण केले आहेत हे आजवर कधी झाले नाही. आज शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे.
संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढले नसते, असेही ते यावेळी म्हणाले. देशात सुरु असलेल्या असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, समाजसेविका ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी भाष्य केले.
त्यानंतर बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये, असे म्हणत देशभरातील खेळाडू, बॉलिवूड अभिनेत्यांनी ट्वीट केले. याविषयी विचारला असता शरद पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय बनली आहे. त्यावर बाहेरचं कुणी बोलावं याचं समर्थन नाही.
मात्र देशाच्या सरकारने शांत राहणे आणि इथली समस्या बाहेर गेली हे योग्य नाही.
दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. पण पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेत या समस्या कशा वाढतील यावर मोदी सरकारचे लक्ष आहे. या दरवाढीमुळे देशातील जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षाबाबत ट्विस्ट
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. “विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.