मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये वरवर सारं काही आलबेल असल्याचे दिसत असले तरी शिंदे गटातील काही आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांबाबत सूचक विधान केले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदार भाजपात सामील होतील, अशी शक्यता तपासे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटातील नाराज आमदारांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये सध्या नैराश्याचे वातावरण निर्माण झालं आहे. सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आपला डाव कुठेतरी फसला असल्याची कबुली शिंदे गटाचे नेते आपल्या मतदारसंघात देत आहेत.”
त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटातील बहुतेक आमदार भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ निशाणीवर निवडणूक लढवतील की काय? अशी चर्चा त्या-त्या मतदारसंघात सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतराचा डाव फसला असून ज्या पद्धतीनं शिंदे सरकारने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, ते निश्चितच महाराष्ट्राला आवडलेले नाही. त्यामुळे नाराज आमदार शिंदे गटाला सोडून भाजपात सामील होतील की काय? अशी चिंता एकनाथ शिंदे यांना पडली आहे, अशी प्रतिक्रिया तपासे यांनी दिली आहे.