नवी दिल्ली – स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्यासाठी कॉंग्रेसने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी ममतांशी संपर्क साधला. त्यानंतर कॉंग्रेसने तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली. विविध कारणांवरून नाराज असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममतांनी बुधवारी तडकाफडकी एकला चलो रे ची घोषणा केली.
तृणमूलचा तो निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया या देशव्यापी आघाडीसाठी मोठा हादरा ठरला. ममतांनी केलेल्या घोषणेनंतर कॉंग्रेसने तातडीने प्रतिक्रिया देताना त्यांच्याशिवाय आघाडीची कल्पनाही करू शकत नसल्याचे म्हटले. त्यातून ममतांच्या मनधरणीचा प्रयत्न तो पक्ष करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. त्यानंतर गुरूवारी खर्गे यांनी ममतांशी संवाद साधल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली. बंगाल आणि देशाच्या इतर भागांत भाजपचा पराभव करणे हा ममतांचा आणि इंडियाचा समान उद्देश आहे.
त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा मार्ग शोधू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ममता काही मिनिटांसाठी जरी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाल्या; तरी सर्व कॉंग्रेसजनांना आनंद होईल, अशी भावना रमेश यांनी व्यक्त केली. ममतांची समजूत काढण्यात कॉंग्रेसला यश येणार का ते आगामी काळात स्पष्ट होईल.
इंडिया एकत्रित लढणार-राहुल
ममतांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगालमध्ये यात्रा पोहचल्यानंतर सूचक वक्तव्य केले. देशभरातील अन्यायाविरोधात इंडिया आघाडी एकत्रित लढेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.