पुणे – लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुती किंवा महाविकास आघाडी कोणालाही समर्थन देणार नाही. लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी दिली. मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंग्राम पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक बाळासाहेब ठाकरे सभागृहात शनिवारी झाली. त्यानंतर मेटे पत्रकारांशी बोलत होत्या. याप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगडसह आदी उपस्थित होते.
महायुतीतून तुम्ही बाहेर पडले आहेत का? या प्रश्नावर डाॅ. म्हणाल्या, “लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करण्याचा निर्णय यापूर्वीही झाला होता. त्यामुळे तटस्थतेचा निर्णय घ्यायला उशीर झाला असे नाही. आता सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकसभेसाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारणात अनुषंगिक भूमिका असतात. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उपस्थित होत नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यालाच राजकारणात महत्व असते. आमचीही भूमिका अशीच होती.’
तानाजीराव शिंदे म्हणाले, “शिवसंग्राम विधानसभेच्या १२ जागा लढवणार आहे, हे आम्ही याआधीही जाहीर केले आहे. विधानसभेच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल, यासाठी ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल किंवा ज्यांच्यासोबत युती करावी लागेल याचाही विचार योग्यवेळी केला जाईल. आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भूतकाळ आहे. नाराजीचा प्रश्न नसून सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार, पण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.’