Cm Eknath Shinde : मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छ, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला होता.त्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी समुद्रात कोणी ट्रॅक्क्टर चालवतं का ? असा खोचक सवाल करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “मुंबई स्वच्छतेसाठी डीप क्लिन ड्राईव्ह योजना गरजेची आहे. ही माझी संकल्पना आहे. एकाच ठिकाणी चार-पाच वॉर्डचे लोक घ्यायचे. दोन-अडीच लोकांना घेऊन रस्ते स्वच्छ करायचे. फक्त रस्तेच नाही, गल्ल्या, नाले, सार्वजनिक स्वच्छतागृहे एकाच दिवशी स्वच्छ करायचे, अशी डीप क्लिन योजना आहे.” असे सांगत या योजनेची माहिती दिली.
पुढे त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेत “मी चौपाटीवरही गेलो होतो. ते (आदित्य ठाकरे) माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. तो जो ट्रॅक्टर होता, त्यावर मागे क्लिनर आहे. तो पाठीमागून फिरतो. त्यात असलेले दगड, प्लास्टिक वेगळे केले जातात. फक्त रेती आणि वाळू मागे राहते. त्यांनी अर्धवट माहिती घेतली आहे”. असे म्हणत ठाकरेंना उत्तर दिले आहे.
एवढे नाही तर पुढे ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी,“आम्ही रस्त्यांची सफाई करतो. समुद्राची सफाई करतो. त्यांनी हातची सफाई केली. तिजोरीची सफाई केली. आम्ही रस्ते धुतोय तेही त्यांना आवडत नाही. त्यांनी तिजोरी धुतली आणि आम्ही रस्ते धुतोय आता. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही यावेळी लगावला.