पुणे : पैसा हा नात्यात दुरावा निर्माण करत असतो. २०१५ पासून तब्ब्ल आठ वर्षाच्या कालावधीत फ्लॅटचा व्यवहार व धनादेश बाऊन्समुळे नणंद आणि भावजयच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा शनिवारी (दि.९) लोकअदालतीत मिटला आणि नाते तुटायचे वाचले. समुपदेशनानंतर भावजयीने फ्लॅटच्या व्यवहारा करिता घेतलेली रक्कम परत देण्याचे मान्य केले. दावा निकाली निघाला.
फिर्यादीच्या मावस भावाला पैशाची गरज होती. त्यामुळे त्याने पतीच्या नावावर असलेला फुरसंगी येथील फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला. तो मावस बहिणीने घेण्याची तयारी दर्शविली. त्यापोटी २०१५ मध्ये १५ लाख रुपये धनादेशाद्वारे दिले. विसार पावतीही केली. काही रक्कम रोख स्वरूपात दिली. परंतु, काही कारणास्तव फ्लॅटचा व्यवहार होऊ शकला नाही. त्यामुळे घेतलेल्या रक्कमेचा धनादेश भावजयीने २०१९ मध्ये नणंदेला दिला. पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊन्स झाला. त्यामुळे तिने सुरूवातीला वकिलामार्फत नोटीस बजावली.
त्यानंतर फिर्यादीने अॅड.खंडेराव टाचले, अॅड. मनिष मगर आणि अॅड. आकाश बिराजदार यांच्यामार्फत न्यायालयात धनादेश बाऊन्स दावा दाखल केला. तो येथील न्यायलयात प्रलंबित होता. करोनामुळे सुनावणीस विलंब झाला. या प्रकरणात भावजयीच्या वतीने अॅड. सुनंदा वाजे या न्यायालयात बाजू मांडत होत्या. हा दावा लोकअदालतमध्ये न्यायाधीश पी बी पवार यांचे पॅनल समोर तडजोडीसाठी ठेवण्यात आला. समुपदेशामध्ये यशस्वी तडजोड झाली. नात्यात निर्माण झालेला दुरावा संपला. भावजयने २० लाख रुपये देण्याचे मान्य करून दिले.
“लोक अदालतमध्ये तडजोड झाल्यामुळे फिर्यादींना भरलेली स्टॅम्प ड्युटी ५५ हजार रुपये परत मिळणार आहेत. ८ वर्षांपासून अडकलेले पैसे मिळणार आहेत. नात्यातील कटुता संपली आहे. दोन्ही बाजूंचा वेळ, पैसा वाचला आणि होणार्या मानसिक त्रासातून सुटका झाली.”- अॅड. खंडेराव टाचले, फिर्यादींचे वकील