मुंबई : राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटातील नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवत असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता अजित पवार यांच्या गटातील पक्षाचे एक ज्येष्ठ आमदार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या एका वक्तव्याची वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यातील राजकीय भविष्य व अजित पवार गटाचे भविष्य याविषयी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. याविषयी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी, “१९९९ ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठीची स्वप्नं पाहिली होती. त्याच पद्धतीने आता अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचं स्पप्न आम्ही पाहातो आहोत”, असे निंबाळकर यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी,“अजित पवारांशिवाय आम्हाला महाराष्ट्रात दुसरा माणूस दिसत नाही ज्याच्यात फक्त सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला २१व्या शतकातलं एक प्रमुख राज्य करण्याची क्षमता आहे”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार गट फुटून सरकारमध्ये सामील झाल्यापासून विरोधकांकडून एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे मुहूर्तही दिले जात आहेत. आमदार अपात्रतेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असेही दावे करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “अजित पवारांना योग्य वेळी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत”, असे निंबाळकर म्हणाले आहेत.