मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर आता स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसकडून कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या मविआच्या नेत्यांवर खोचक टीका करण्यात आल्यानंतर त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी “लोक बदल करत असतात. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी नऊ महिने गेले. जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सत्ताबदलाची संधी लोकांना दिली जाते, तेव्हा ते लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय देत असतात. हे कर्नाटकमध्ये दिसलं. महाराष्ट्रातही सामान्य लोक हे निकाल भाजपाच्या विरोधात देतील. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पण त्याला यश आलं नाही. तिथे जे घडलं, ते प्रत्येक राज्यात घडेल”, असे म्हटले आहे.
“महाराष्ट्र भाजपामध्येही या निकालानंतर अस्वस्थता आहे. शिवसेनेतून फुटलेल्या गटातही अस्वस्थता आहे. २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेत लोक भाजपाच्या विरोधात निकाल देतील”, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. “मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी” अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यावरून रोहित पवारांनी टोला लगावला आहे.
यावेळी “अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार केला. तरीही भाजपा हरते. हा एक मोठा संदेश आहे. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाळणा कुठे, बारसं कुठे? असं बोलण्यात अर्थ नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. त्यामुळे उगाच शब्दांत खेळू नका. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. संतांच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्धी चांगली झाली आहे. योग्य निर्णय ते देतील. उगाच गंडवण्याचा प्रयत्न करू नका”, असेही रोहित पवार म्हणाले.