मुंबई – हाथरस घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, हे प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे अन् हुकूमशाही पद्धतीने हाताळले आहे. हाथरसमधील पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. यामुळे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असा हल्लाबोल महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. तसेच भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. “बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झालेली नाही. योगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
थोरात म्हणाले, हाथरस प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला? उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली? पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या? आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तर योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा सत्तेचा माज
कॉंग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच प्रियांका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत पोलीस अधिका-यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे, हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.