शिक्रापूर- राज्यात करोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने सर्वच सण उत्सवावर निर्बंध घातले आहेत. पुढील काही दिवसांत नवरात्रौत्सव सुरू होत आहे. करोनाचा प्रसार वाढणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय रणस्तंभावरील मानवंदना कार्यक्रमाचा निर्णयही त्यावेळची परिस्थिती पाहून शासनस्तरावरच होईल, असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
शिरुर व हवेली तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची डॉ. देशमुख यांनी पाहणी केली. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक तसेच पेरणे फाटा परिसराला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक विलास आंबेकर, अशोक केदार, संजय ढमाल, बाळासाहेब गाडेकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयरणस्तंभ, श्रीक्षेत्र तुळापूर येथील छत्रपती शंभूराजांच्या बलिदानभूमीची पाहणी केली. कोरेगाव भीमा येथे परिसराची पाहणी करत पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्याकडून दंगलीचा आढावा घेतला. श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन गोविंद गोपाळ यांच्या समाधीचेही दर्शन घेत सुरक्षा यंत्रनेची पाहणी केली.
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. या परिसरात उत्तरप्रदेश व बिहार राज्यातून येणारे कामगार वर्ग सहज गावठी कट्टे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अग्निशस्त्र खरेदी विक्रीची साखळी तोडण्यासाठी आणि अग्निशस्त्र असणाऱ्यांवर जरब बसविण्यास ग्रामीण पोलीस सज्ज आहेत.
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण.