भोपाळ – लॉक डाऊन लागू होण्यापूर्वी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता उलथवत भाजपने शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश व त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या २२ आमदारांचा राजीनामा यामुळेच भाजपला काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणे शक्य झाले.
काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिकाम्या झाल्या असून सद्य परिस्थिती पाहता कोरोना संकटानंतरचं त्या जागांसाठी मध्यावधी निवडणुका होतील असा अंदाज आहे.
अशातच आता, त्या रिक्त २२ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने रडीचा डाव मांडला असल्याची तक्रार काँग्रेस आमदाराने केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेस आमदार गोविंद सिंग यांनी भाजप या २२ मतदारसंघांतील मतदारांना भुलवण्यासाठी मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्याचा अवैध रित्या वापर करत असल्याचा आरोप लगावलाय.
याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य सचिव इक्बालसिंग बैस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यांनी योग्य कार्यवाही न केल्यास आपण ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एका वृत्त संस्थेशी संवाद साधताना सिंग यांनी, “भिंड या माझ्या जिल्ह्यासाठी भाजपने मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. मात्र रोजगार निर्मिती केली जात नाहीये. याचाच अर्थ असा होतोय की ते या पैशांचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी अवैध मार्गाने करतायेत.” असं सांगितलं.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते दीपक विजयवर्गीय यांनी, काँग्रेसचे आरोप म्हणजे त्यांना निवडणुकांआधीच पराभवाची चाहूल लागल्याचं द्योतक असल्याचं म्हंटलंय.