मुंबई: पालघर जिल्ह्यातील गडचिंचले भागात झालेल्या साधू हत्याकांडप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याविषयीचे आदेश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
१६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे हत्या करण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या भागाचा दौरा केला व गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधला.
हे हत्याकांड माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी म्हणून पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी मुंबई येथे परतल्यानंतर जाहीर केला. पालघर जिल्ह्याचा कारभार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवला असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ३५ कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात इतरत्र बदली करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागाकडून करण्यात येत असून या चौकशीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे गृहमंत्र्यांनी पालघरमध्ये सांगितले होते.