सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) – करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरनगर (ता.बारामती) परिसरातील उद्यापासून (दि.२०) वाणेवाडी आठवडे बाजार भरणार नसल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोनाबाबत ग्रामीण भागात भीती असली तरी नागरिक योग्य ती दक्षता घेत आहे.
सोमेश्वर नगर, कारखाना, वाणेवाडीची मुख्य बाजारपेठ असूनही ही ठिकाणे सध्या ओस पडली आहेत. प्रत्येकजण ‘करोना’च्या धास्तीने काम आटोपल्यानंतर घरात राहणे पसंत करीत आहेत. गावातील मुख्य चौक, हॉटेल्स, मंदिर आणि वर्दळीच्या या मुख्य ठिकाणांवर लोक येणे टाळत असल्याने परिसरात शांतता पसरलेली जाणवते आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम चालू असल्याने येथे ऊसतोड कामगार, नोकरदार, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची गैरसोय होणार असून वाणेवाडी येथील शुक्रवारी आठवडे बाजार न भरल्यास आर्थिक उलाढालीवर थेट परिणाम होणार आहे.