Onion Issue । Maharashtra – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून 4 महिने 27 दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, असा आरोप शेतकरी संघटनांसह विरोधकांनी केला आहे.
तर दुसरीकडे विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामन्यांचे हीत पाहते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा हा शेतकऱ्यांना हसवतो कमी आणि रडवतोच जास्त आहे.
कधी अस्मानी संकट तर कधी केंद्र सरकारची बदलत्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या वर्षभरातीलच परिस्थिती सांगायची झाल्यास कांद्याला चांगला भाव मिळायला सुरुवात झालेली असतानाच अचानक डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात कांदा प्रश्न चांगलाच पेटला.
या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी शेतकऱ्यांसह संघटना रस्त्यावर उतरत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र वातावरण बघायला मिळत असतानाच दिंडोरीसह अनेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एकीकडे कांद्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. मात्र, दुसरीकडे या निर्णयानंतर आज पहिल्याच दिवशी अनेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले असून शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच समाधानकारक बाब आहे.
विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या सरकारने नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित बघितले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.