पुणे – कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी सुरु असून न्यायालयीन प्रक्रिया पुणे पोलिसांकडून केली जात आहे. या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत चर्चा केली. त्यावर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार असल्याचे आयुक्तांना स्पष्ट केले. यावेळी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया हेही उपस्थित होते.
राज्यात २१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या दरम्यान नोंद करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त आणि उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने काम करत कोणते गुन्हे मागे घ्यायचे? याचा निर्णय या समितीने केलेला आहे.
या संदर्भात मोहोळ म्हणाले, ‘व्यापारी बांधव कोरोनाच्या संकटकाळी प्रशासनाला सहकार्य करत असतानाही तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर यात देवेंद्रजींनी व्यापाऱ्यांना दिलासा देत गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याची पूर्तता लवकरच होत आहे.’
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रांका म्हणाले, ‘राज्य सरकारने गुन्हे मागे घेण्याची स्वागतार्ह घोषणा केली. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भात तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका असून या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा पोलीस आयुक्तांशी झाली आहे.’