नवी दिल्ली – २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही वेळोवेळी अनेक सभांमधून हा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, यापुढे भाजपने काँग्रेसमुक्त भारताचा विचारही करू नये, असा इशारा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिला आहे.
राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं आहे. काँग्रेसला 965 तर भाजपला 736 प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. मंगळवारी हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात 49 पैकी 23 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे, तर भाजपला सहा ठिकाणी सत्ता मिळाली आहे. इतरांना 20 पालिकांमध्ये यश मिळालं आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले कि, मोदी, शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताची कल्पनाही करू नये. कारण भारताचे संस्कार, परंपरा आणि संस्कृतीसोबत काँग्रेसचा डीएनए जोडलेला आहे. भाजपचे नेते सांगतात एक आणि करतात एक म्हणूनच भाजपला लोकांनी नाकारले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजस्थानमधील 33 जिल्ह्य़ांपैकी 24 जिल्ह्य़ांमध्ये निवडणूक झाली होती. त्यात तीन महापालिका, 28 नगरपालिका आणि 28 नगर पंचायतींचा समावेश होता.