सातारा – डबेवाडीपासून (ता. सातारा) सातारकडे येणाऱ्या रस्त्यावर डॉल्बीच्या गाण्यावर नाचण्याच्या वादातून 12 जून 2014 मध्ये झालेल्या खूनप्रकरणी अभिजीत बबन पवार, सागर मारूती कार्वे (दोघे रा. डबेवाडी) या दोन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. खान यांनी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, डबेवाडी येथे अजय माने याच्या लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी अमोल चौगुले, अजय नलवडे व विकास पवार असे तिघेजण अजय नलवडेच्या मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट आणि वसंत गायकवाडच्या मोटारसायकलवरून वसंत व धोंडीराम शिंगाडे असे डबेवाडी येथे गेले होते. त्यावेळी डबेवाडी गावात वरात आली होती. वरातीमध्ये डॉल्बी लावून नाचगाणे चालू होते. यावेळी अक्षय उर्फ पप्पू बबन पवार हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरवर डॉल्बी लावून ट्रॅक्टर चालवत होता. गावातील पद्मावती देवीच्या मंदिराच्या समोर वरात आल्यावर मंदिरासमोर नाचगाणे चालू होते. अक्षय पवार ट्रॅक्टर उभा करून ट्रॅक्टरजवळ उभा होता. अजय नलवडे त्यास नाचण्याकरता डॉल्बीच्या पुढे ओढू लागला. परंतु तो नाचण्यास आला नाही व त्याने अजयला ढकलून दिले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
या प्रकारामुळे तेथे नाचायला असलेले डबेवाडीतील लोक आणि विकास पवार, त्याच्या मित्रांच्यात भांडणे सुरू झाली. यावेळी अजय नलवडे याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड हातात घेवून अक्षय पवारच्या डोक्यात मारला. अक्षय पवार गंभीर जखमी झाला. त्यानंतर अजय नलावडे व त्याचे साताऱ्यातील मित्र असे सगळे मिळून साताऱ्याकडे निघाले असताना विकास पवार वरातीमध्ये जास्त नाचल्याने त्याला दम लागल्याने हे सर्वजण डबेवाडीपासून सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्धा किलोमीटर अंतरावर एका पत्र्याच्या शेडजवळ रस्त्याच्या कडेला थांबले होते.
त्यावेळी सतीश विठ्ठल माने, अक्षय उर्फ पप्पू बबन पवार, सागर जयसिंग देवरे, प्रदीप नारायण देवरुखे, संग्राम चंद्रकांत माने, सागर दादासाहेब माने व इतर 4 ते 5 जणांनी या युवकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यापैकी अक्षय उर्फ पप्पू बबन पवार याने लाकडी दांडक्याने तर अभिजित बबन पवार, सागर कार्वे यांनी गुप्तीने विकास प्रकाश पवार याच्या डाव्या छातीवर, उजव्या बरगडीवर, पाठीत व डोक्यात वार करून त्याचा खून केला. त्याचा मित्र वसंत काशिनाथ गायकवाड याला अभिजित पवार व सागर कार्वे यांनी गुप्तीने वार करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी अमोल शिवदास चौगुले ( रा. 439 मंगळवार पेठ सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. खान यांच्यापुढे सुनावणी झाल्यानंतर त्यांनी सर्व साक्षी पुरावे, विशेष सरकारी वकील संतोष भोसले, नितीन मुके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून यातील अभिजित बबन पवार व सागर मारूती कार्वे यांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. इतर सहा जण पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाले. या खटल्यात प्रॉसिक्यूशन स्कॅडचे पोलीस शुभांगी भोसले, शुभांगी वाघ यांनी काम पाहिले.