चट्टोग्राम – इशान किशनने झळकालेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर 227 धावांनी विजय मिळविला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने हारलेल्या भारताने अखेरच्या सामन्यात शान राखली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन केवळ तीन धावा करून माघारी परतला. यानंतर इशान किशन व विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशा गुडघे टेकण्यास भाग पाडले.
For his fiery 🔥 🔥 double ton, @ishankishan51 bags the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh by 227 runs in the third ODI 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqugMuM #BANvIND pic.twitter.com/CJHniqrIoa
— BCCI (@BCCI) December 10, 2022
इशानने 85 चेंडूवर आपले पहिले शतक पूर्ण केले. मात्र, यानंतरही तो अजिबात थांबला नाही. त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेत आपल्या शतकाला द्विशतकामध्ये परिवर्तित केले. इशानने बाद होण्यापूर्वी 131 चेंडूचा सामना करताना 210 धावा केल्या. यामध्ये 24 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता.
दुसऱ्या बाजूने विराटने संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत आपल्या कारकीर्दीतील 72 वे शतक पूर्ण केले. त्याने बाद होण्यापूर्वी 91 चेंडूवर 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त मध्यफळीतील इतर फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. श्रेयस अय्यर 3, तर कर्णधार राहुल केवळ आठ धावा करू शकला. अक्षर पटेलने 20 व वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक 37 धावा चोपत संघाला निर्धारित 50 षटकात 8 बाद 409 अशी मजल मारून दिली.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावल्याबद्दल मला आनंद आहे. परंतु या फॉरमॅटमधील पहिले तिहेरी शतक बनण्याची सुवर्ण संधी गमावल्याबद्दल दु:ख झाले. मी 15 षटके शिल्लक असताना बाद झालो. मला 300 धावांपर्यंत मजल मारता आली असती.
– इशान किशन
निर्धारित धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात निराशाजनक ठरली. त्यांनी 50 धावांच्या आत बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडून भारताने सामन्यावर मजबूत पकड बनवली. बांगलादेशकडून ऑलराऊंडर शाकीब अल हसनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.
#BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे
कुलदीप यादवनेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. शाकीब व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ क्रिजवर टिकता आले नाही. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतासाठी खलनाक ठरलेला मेहंदी हसनला उमरान मलिकने स्वस्तात माघारी पाठविल्यानंतर बांगलादेशचा डाव 34व्या षटकात 182 धावांवर गुंडाळला.
संक्षिप्त धावफलक :
भारत : 50 षटकांत 8 बाद 409 (इशान किशन 210, विराट कोहली 113, वॉशिंग्टन सुंदर 37, अक्षर पटेल 20. तस्किन अहमद 2-89, इबादत हुसेन 2-80, शाकिब अल हसन 2-68)
बांगलादेश : 34 षटकांत सर्वबाद 182 (लिटन दास 29, शाकीब अल हसन 45, यासीर अली 25, तस्किन अहमद नाबाद 17. शार्दुल ठाकूर 3-30, अक्षर पटेल 2-22, उमरान मलिक 2-43)