मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहाचे कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचे काही कारण नाही असे सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.
विधानसभेचे कामकाज परंपरेनुसार झाले पाहिजे असे सांगत सुधीर मुनगंटीवार नियमांचा दाखला देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सुधीर मुनगंटीवार संतापले. विधानसभा नियमाच्या संदर्भात हरकतीचा मुद्दा आहे असे सांगताना सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख असे मधेच बोलले होते, आता आतमध्ये जात आहेत. तुम्ही मधे बोलू नका, काही कारण नाही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी असे वक्तव्य केले.
यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरकत घेतली. “मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांनी असाच विरोध केला म्हणून जेलमध्ये जात असल्याचे म्हटले आहे. हे काय धमकी देत आहेत का ? सभागृहात धमकी दिली जात आहे. काय सुरु आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील हरकत घेताना म्हटलं की, “एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार आहे. मुनगंटीवार यांनी चमचेगिरी सुरु आहे का असा उल्लेख करणं योग्य नाही. हे शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकावेत. यापुढे असं बोलणार नाही असी समजदेखील द्या”.