नागपूर- देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा एवढा भीषण अपघातात मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत यांनी व्यक्त केलेली शंका अनेकांच्या मनात आहे.राऊतांच्या मनातील शंकेचे निरसन व्हावे, हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते व मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
हा अपघात नसून घातपात असू शकतो. याची सविस्तर चौकशी व्हावी. संजय राऊत यांच्या मनातील शंका अनेक जणांच्या मनात आहे. त्यामुळे हा नेमका अपघात कसा घडला याची माहिती देशाला कळावी, सत्ताधाऱ्यांनी याची माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींचे आरक्षण गमावण्यासाठी भाजप जबाबदार आहे. जोपर्यंत केंद्र सरकार याबाबत अमेंडमेंट आणत नाही. तोपर्यंत हे शक्य नाही.भाजपने मात्र या प्रकरणी नेहमीच टोलवाटोलवी केली आहे. घटनादुरुस्ती करुन केंद्र सरकारने ओबीसींचे 27 टक्के आरक्षण क्लिअर करावे आणि विषय संपवावा. भाजपने ढोंगीपणा करुन लोकांमध्ये संभ्रम तयार करु नये, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.