अतिशय मिश्र लोकवस्ती असलेला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ असून, तो मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदार संघावर सर्वच पक्षातील अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. या मतदार संघात मिश्र आणि सर्वधर्मीय लोकवस्ती असली तरी नवबौद्ध आणि मातंग समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत. तसेच झोपडपट्टीचा भागही यामध्ये येतो.
वास्तविक हा मतदार संघ कॉंग्रेस विचारसरणीचा आहे. 2014मध्ये येथे पूर्णपणे कॉंग्रेसचे वर्चस्व होते. याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डावरही कॉंग्रेसचेच वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर मोदी लाटेत तेथे भाजपचे दिलीप कांबळे निवडून आले. तर बोर्डावरही भाजपने वर्चस्व मिळवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा ट्रेन्ड पाहता, वंचित बहुजन आघाडीने येथे उभारी घेतली आहे. तर मुस्लिम मतांसाठी एमआयएमनेही शिरकाव केला आहे. महापालिका निवडणुकीवेळी थेट ओवेसींनाच येथे प्रचारासाठी आणण्यात आले होते.
येथे मुस्लिम समाजाची मतदारांची संख्याही मोठी आहे. आजपर्यंत नवबौद्ध आणि मुस्लिम समाज हा कॉंग्रेसबरोबर होता. मात्र, वंचित आणि एमआयएमने जर या ठिकाणी उमेदवार उभा केला, तर भाजपपेक्षा कॉंग्रेसच्याच मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, पाच वर्षांत विद्यमान आमदारांनी केलेल्या कामाचा लेखाजोखाही मतदार पाहणार आहेत. त्यांच्याकडे तिकीट जाणार की, त्यांच्याच घरातील दुसऱ्या कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय कॉंग्रेसकडून मागील वेळी रमेश बागवे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली. 2014मध्ये तिसऱ्या स्थानावर शिवसेनेच्या परशुराम वाडेकर हे होते. भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढल्याने त्याचा तोटा प्रत्येक उमेदवाराला मतांच्या विभागणीतून बसला आहे. कांबळे विजयी जरी झाले, असले तरी त्यांना केवळ 39.65 टक्केच मते मिळाली आहेत.
मातंग समाज हा एकत्र असला, तरी या भागात समाजात गट आहेत. तेही कोणत्या भागातून स्थलांतरित होऊन आले आहेत, त्याप्रमाणे हे गट आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम पट्ट्यातील तर दुसरा गट हा सोलापूर, करमाळा, माढा, लातूर, उस्मानाबाद या दुष्काळी पट्ट्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची विभागणी साहजिकच उमेदवारनुसार होणार आहे. याशिवाय गुजराती, कानडी, पद्मशाली समाजही याठिकाणी मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा कौल कोणाकडे असणार, हे मतदानात कळेल.