पिंपरी – मागील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भोसरीवरुन दिघीला जाणाऱ्या आणि दिघीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. आता विकास आराखड्यातील मंजूर सीएमईच्या भिंतीच्या कडेने नऊ मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांना घरे देऊन हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे पंचवीस वर्षांपासून जोडणारे मुख्य तीन रस्ते पूर्ण होतील. यामुळे दिघी वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होईल, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
विकासकामांची अधिक माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून दिघीच्या रस्त्यांचे काम रखडले होते. दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. रखडलेले शंभर मीटरचे अंतर पार करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण या रस्त्याचे डांबरीकरण करणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार संबंधित जागा मालकांसोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावला असून रस्त्याचे डांबरीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्याने दिघी व भोसरी परिसरातील दादासाहेब साळुंके, भरत जानभरे यांच्यासह अनेक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
दिघीतील सिमाभिंती शेजारी विकास आराखड्यामध्ये बारा मीटर व 15 मीटरचा रस्ता सूचविण्यात आला आहे. या रस्त्याची एकूण लांबी दीड हजार मीटर इतकी आहे. हा रस्ता बुद्ध विहार शिवरस्ता, भोसरी दिघीरोड ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर दरम्यान आहे. या रस्त्यामध्ये कमीत कमी घरे बाधित होतील, असे नियोजन करण्यात आल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. या रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा पालिकेच्या महासभेमध्ये विषय घेण्यात आला आहे. यामुळे ममता चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार असून भोसरीहून पुण्याकरिता जाणारी वाहतूकही सुरळीत होणार आहे. भोसरी दिघी परिसरातून पुण्याकडे जाण्या-येण्यासाठी प्रवाशांना मदत होईल. तसेच साईपार्क मधील नागरिकांनाही या रस्त्याचा उपयोग होणार आहे. हा सर्व परिसर वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावून विशेष भेट दिल्याची भावना दिघीतील रहिवासी बाळासाहेब सुपे, सौरभ हगवणे यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली.