पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महिलांवरील अत्याचार आणि वाढत्या महागाईवर मौन का, असा प्रश्न महाविकास आघाडीतील महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला विचारला आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुण्यातील त्यांच्या प्रचारदौऱ्यात भाजपने द्यावीत, अशी मागणी या महिलांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी – इंडिया आघाडी महिला पदाधिकाऱ्यांची रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम,
नीता रजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष मृणाल वाणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला शहरप्रमुख पल्लवी जावळे, निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
महागाई, मणिपूरमधील हिंसाचार, कुस्तीपटू महिलांवरील अत्याचार,उन्नाव आणि हाथरस येथे महिलांवर झालेला अत्याचार याविषयी पंतप्रधानांनी बोलावे. उत्तर द्यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे. आम्हांला सन्मानाने बसायला जागा दिली तर, आम्ही तेथे जाऊन त्यांना हा प्रश्न विचारू, असे या पदाधिकारी म्हणाल्या.