सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा उपक्रम
कामशेत – नाणे मावळातील नेसावे गावामध्ये दुर्लक्षित असलेल्या पेशवेकालीन विहिरीची पडझड झाली होती. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नेहमीच धडपड करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान व गावातील युवकांनी श्रमदानातून ही विहिर पुनर्जीवित करण्याचे ठरवले. यासाठी गावातील युवक व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यापासून कामाला सुरुवात केली. विहिरीतील सुमारे 5 टन गाळ काढला असून, यामध्ये विहिरीच्या चिरेबंद असलेले दगड वेगळे काढले आहे.
लॉकडाऊन असल्याने अनेक जण पार्ट्या करताना दिसत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान व नेसावे गावातील युवकांनी घेतलेल्या या अभियानाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. या विहिरीतील संपूर्ण गाळ काढून पावसाळ्यापूर्वी विहिर बांधण्याचा मानस यावेळी स्थानिक युवकांनी केला.
विहिर ही पेशवेकालीन असून, विहिरचे बांधकाम हे चिरेबंदी दगडात केलेले आढळते. तसेच विहिरीच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.