मंचर -आंबेगाव तालुक्यातील अनेक नागरिक आपल्या मूळ गावांत बाहेरगावांहून गेल्या दीड महिन्यांपासून येत आहेत. यामध्ये मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमधून येणाऱ्याची संख्या अधिक आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने 14 दिवस क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी संबधित नागरिक घरामध्ये न राहता गावांमध्ये फिरत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील अनेक नागरिक पुणे-मुंबई, तसेच इतर ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.सध्या अनेक ग्रामस्थ करोनाच्या धास्तीमुळे गावाकडे आले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, काही गावांतील ग्रामस्थ मात्र क्वारंटाइन करण्यासाठी व्यवस्था केलेल्या शाळांमध्ये राहण्यास नकार देत आहेत, त्यामुळे अजूनपर्यंत करोनामुक्त असलेल्या आंबेगाव तालुक्यात कारोनाची लागण झाली, तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
तालुका प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये बाहेरून प्रवास करून आलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी गाव पातळीवर स्थानिक कमिटीचे गठन केले असले तरी कागदोपत्री समिती नावापुरतीच दिसत आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची नेमणूक बाहेरून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी केली असली तरी गावातीलच ग्रामस्थ असल्याने राजकीय हेतू समोर ठेवून बाहेरून आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यास स्थानिक कमिट्या धजावत नाहीत, त्यामुळे वाद टाळण्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.