नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी १३ राज्यांमधील ८८ जागांवर मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ६१ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम आकडेवारी उद्या (शनिवार) हाती येण्याची शक्यता आहे.
केरळ, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) बिघाड झाल्याच्या आणि बोगस मतदानाच्या काही तक्रारी करण्यात आल्या. त्या वगळता इतरत्र मतदानाची प्रक्रिया सुरळितपणे आणि शांततेत पार पडली. त्रिपुरात सर्वांधिक ७८ टक्के मतदान झाले. तर, उत्तरप्रदेशात सर्वांत कमी म्हणजे सुमारे ५४ टक्के मतदानाची नोंद झाली.
केरळमधील लोकसभेच्या सर्व २० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्या राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदारांनी कौल दिला. केरळखालोखाल कर्नाटकमधील १४ आणि राजस्थानातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे १ हजार २०६ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.
लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या आणि सर्वांत मोठ्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला १०२ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी हक्क बजावला. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे यादिवशी ९४ मतदारसंघांत मतदान होईल.