पदपथ चालण्यायोग्य आणि सायकल ट्रॅक सुरक्षित असावेत
“परिसर’ संस्थेकडून सर्वेक्षण
पुणे – शहरात पदपथ आणि सायकल ट्रॅक सुरक्षित आणि चालण्यायोग्य झाल्यास वाहनांचा वापर कमी होऊन पुणेकर चालणे तसेच सायकल चालवण्याला अधिक प्राधान्य देऊ शकतात. याशिवाय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसची वारंवारता आणि गर्दी कमी केल्यास येत्या काळात पीएमपीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढू शकते, असे “परिसर’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि उद्योग बंद असल्याने, या कालावधीत प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. प्रदूषणामध्ये वाहनांमुळे होणाऱ्या उत्सर्जनामध्ये अधिक वाढ होते. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी “परिसर’ संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परिसरात संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. यामध्ये 154 जणांनी मत नोंदवले होते. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी चालणे आणि सायकल चालवण्याला प्राधान्य देऊ शकणार असल्याचे मत नमूद केले आहे.
शहरातील पदपथ चालण्यायोग्य असल्यास दुचाकी किंवा चारचाकी ऐवजी पुणेकर चालण्याला प्राधान्य देऊ शकतात, असे निरीक्षण देखील सर्वेक्षणातून समोर आले आहे. 154 नागरिकांपैकी तब्बल 131 जण चालण्याला प्राधान्य देणार असल्याचे, 18 नागरिकांनी कदाचित तर 5 नागरिकांनी चालणे प्राधान्य देणे शक्य नसल्याचे नोंदवले आहे. यासह सुरक्षित सायकल ट्रॅक असल्यास दुचाकी आणि चारचाकी ऐवजी पुणेकरांकडून सायकल वापरण्यास प्राधान्य मिळणार असल्याची शक्यता सर्वेक्षणातून समोर आली.
154 नागरिकांपैकी 119 नागरिकांनी चालण्यासाठी हो असा पर्याय निवडला आहे. तर अनुक्रमे 25 आणि 10 नागरिकांनी कदाचित आणि नाही असा पर्याय नोंदवला आहे. बसमध्ये असणारी गर्दी आणि अनियमित वेळापत्रक यामुळे नागरिक पीएमपीचा बसमधून प्रवास करणे टाळतात. परंतु बसमधील गर्दीचे प्रमाण कमी झाले आणि बसेसची अधिक वारंवारता वाढल्यास पीएमपीतून प्रवास करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मत नागरिकांनी नोंदवले असल्याची माहिती “परिसर’ संस्थेच्या वतीने देण्यात आली.