वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील प्रभाग चारमधील गणपती मंदिर ते मोरया चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रेंगाळले आहे. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वडगाव शहरातील मुख्य रस्त्यानंतर शहरातील हा दुसरा प्रमुख रस्ता आहे. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. बंदिस्त जलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले. त्यासाठी चांगल्या स्थितीतील रस्ता त्यासाठी खोदण्यात आला. या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता पुढील काँक्रिटीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची गरज होती.
मात्र, हे काम अर्धवट सोडण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या प्रभागातील काही काँक्रिटीकरणाची कामे त्यानंतर सुरू होऊन ती पूर्णही झाली. मात्र, या रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रेंगाळले आहे. नागरिकांनी विचारणा केली असता निधी कमी आहे, निवडणुकीची आचारसंहिता आहे, अशी उत्तरे त्यांना मिळत आहे. निधी नव्हता; तर चांगला रस्ता खोदला कशाला ? असा सवाल नागरिक करत आहेत.
बंदिस्त जलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम करून नंतर त्याठिकाणी मोठी खडी टाकण्यात आली. वाहनांमुळे ही खडी उडून काही नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास आणखी अपघात होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. वाहनचालक व पादचाऱ्यांना कसरत करतच ये-जा करावी लागत आहे. दुचाकी वाहनांना तेथे अपघाताचा धोकाही संभवतो. पावसाळ्यात तो अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही चेंबरची झाकणे नसल्याने तेथेही अपघात होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक संपल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.