नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ परिसर हा निर्सग सौंदर्याने नटलेला आहेच. त्याच बरोबर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये विविध प्रकारची फळे, फुले येथे पहायला मिळतात. त्यातच नाणे पठार ते कसूरपर्यंतच्या विस्तीर्ण पठारावरील वनक्षेत्रामध्ये सुमारे ३५ ते ४० वर्षांपासून सटवाईवाडी, गबालेवाडीसह पायथ्यालगतची अनेक गावे आणि विखुरलेला धनगर समाज दरवर्षी उन्हाळ्यात हिरड्याच्या संकलन व विक्री करतात. हिरड्यासह या डोंगररांगा आणि वनांमध्ये अढळणाऱया विविध रानमेव्यावर संशोधन, प्रक्रिया, विक्री याबाबत अद्ययावत प्रशिक्षणाची गरज आहे.
नाणे पठार ते कसूर पठारापर्यंत खासगी मालकी हक्काची आणि वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधी हिरडा या झाडांचे प्रमाण आहे. हिरडा हा चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान फुलावर येतो व हळूहळू फळ धारणा होते.
एक ते दीड महिन्याच्या आत त्याच्यावरील हिरडे जमा करण्यासाठी लहान मुले आणि महिला भटकत असतात. सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत दैनंदिन कामातून वेळ काढून हिरडा विक्रीमधून उत्पन्न मिळविले जाते.
विक्रीसाठी तयार हिरडा
हिरड्यातील कचरा दूर करून तो तुडवून किमान ८ ते १० दिवस कडक उन्हामध्ये सुकविला जातो. त्यानंतर, डबा, ड्रम किंवा गोणींमध्ये जमा करून ठेवला जातो. मे अखेरपर्यंत सर्व पठार आणि वाड्या-वस्ती मिळून सुमारे १० ते १२ टन हिरडा एकत्रित करून व्यापाऱ्यांना विकला जातो.
हिरड्याची झाडे उंच असल्याने जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते. हिरडा व त्याचबरोबर इतर टिकाऊ रानमेव्याबाबत संशोधन, प्रक्रिया, विक्री याबाबत अद्ययावत प्रशिक्षण मिळाल्यास अर्थार्जनासह होणारे तरुणांचे स्थलांतरही थांबेल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
हिरड्याचे औषधी गुणधर्म
– हिरड्याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
– खोकला, अजीर्ण झाल्यावर हिरडा घेतला जातो.
– जखम झाल्यावर खोबरेल तेलासह हिरडा पावडरचा उपयोग केला जातो.
– ओला हिरडा भाजून लावल्यास पावसाळ्यात होणाऱ्या चिखल्या बऱ्या होतात.
– त्रिफळा चूर्णामध्ये हिरड्याचा वापर केला होतो.
– पित्ताचा त्रास कमी होतो, पचनक्रिया सुधारते.