मुंबई – बॉलीवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे. यातच सगळ्यावर संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरातून भाष्य केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस इतका वेळ चौकशी का करत आहेत, असा सवाल त्यांनी ‘सामना’तील एका लेखात केला आहे.
‘सुशांतच्या आत्महत्येला जवळपास महिना होत आला आहे आणि तरीसुद्धा त्याबद्दल इतकी चर्चा होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर देशात इतरसुद्धा घटना घडल्या आहेत. मात्र त्यावर कोणाचंही लक्ष जात नाहीये. सुशांतच्या मृत्यूवर संपूर्ण लक्ष केंद्रीत आहे,’ असं त्यांनी या लेखात म्हटलंय.
संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित करत पुढे लिहिलं, ‘सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता आणखी कशाचा तपास बाकी आहे? सुशांत अज्ञातवासात होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती हे तर स्पष्ट आहे. या घटनेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या. संगीत क्षेत्र-घराणेशाही यांचीही हवा निघाली. आता आणखी काय बाकी आहे?’असा सवाल त्यांनी ‘सामना’तील एका लेखात केला आहे.