वडगाव मावळ, (वार्ताहर) – मागील काही महिन्यांपासून मावळ तालुक्यातील रस्त्यांवर प्रामुख्याने जुना मुंबई पुणे महामार्गावर दर आठवड्यातील शनिवार – रविवारी बाईक रायडरची संख्या वाढली असून वाऱयाच्या वेगाने जाणाऱया या बाईक रायडर्सची दहशत पाहायला मिळत आहे. तसेच महामार्गावर अतीवेगाने १५ ते २० ग्रुप ने जाणाऱ्या या दुचाकिमुळे महामार्गावर इतर वाहनाच्या अपघातांना आमंत्रण ठरत आहे.
मागील महिन्यात अतिवेगाने जाणाऱया बाईक रायडरचे अपघाती निधन झाले होते. तरी त्याचा फारसा परिणाम या बाईक रायडरवर होताना दिसत नाही. सुट्टीच्या दिवशी प्रामुख्याने शनिवारी व रविवारी सकाळच्या सुमारास महामार्गावरून स्पोर्टस् बाईकचे घोळके अतिवेगाने जातात. या स्पोर्टस् बाईकच्या सायलेन्सरमध्ये बदल केल्याने या बाईक रस्त्यावरून जाताना मोठ्याने आवाज करत जातात.
यामुळे महामार्गावरून जाणारी इतर वाहने देखील बिचकतात. परिणामी लक्ष विचलीत होऊनही अपघात घडत आहेत. तसेच अती वेगाने जाणाऱ्या या दुचाकींचा इत्तर छोट्या वाहनांना धक्का लागल्याने अनेक अपघात झाल्याच्या घटना मावळात होत आहेत. आठ, पंधरा दिवसांत एखादी घटना होऊन नाहक बाईक रायडरला आपला जीव गमवावा लागत आहे.
बाईक रायडर स्टंटबाजी
बाईक रायडर महामार्गांवरून जाताना स्टंटबाजी करत जातात. अनेकजण हात सोडून वाहने सुसाट चालविणे, बाईकवर उभे रहाणे, एखादी उडी मारणे असे प्रकार करत ते जातात. त्यातच तोल जाऊन किंवा दुसऱयाला धक्का लागून अपघात होत आहेत. या बाईक स्वरांच्या घोळक्यात इतर वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
सुमारे 100 ते150 पेक्षा अधिच्या वेगाने जाणाऱ्या या दुचाकी स्वरांवर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. तसेच कारवाई करायचे म्हटले तरी त्यांचा वेग असल्याने ते अनेकदा पोलिसांच्या हाती लागत नाहीत. र्व सामान्य नागरिकांमधून या बाईक रायडर वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरून अतिवेगाने जाणाऱ्या बाईक रायडरवर आमची नजर असून नाकाबंदी करून अशा अतिवेगाने जाणाऱ्या बाईक रायडरवर कारवाई करण्यात येईल. – सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस अधीक्षक.