टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – आंदर मावळ भागामध्ये गुरुवार (ता.१६) दुपारी चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बेलज येथील पॉलिहाऊस, राजपुरी येथील घरे व पोल्ट्रींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर, राज्य शासनाचे अधिकारी शुक्रवारी (ता. १७) येऊन नुकसानीचे पंचनामे करून गेले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
बेलज येथील शेतकरी सुभाष ओव्हाळ व त्यांच्या दोन बंधूंनी मागील वर्षी २५ गुंठ्यांमध्ये पॉलिहाऊस उभे केले होते. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, जोरदार वादळी वारा व पावसामुळे पॉलिहाऊस पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे.
या शेतकऱ्यावर आता एक प्रकारे अस्मानी संकटच येऊन उभे राहिले आहे. राज्य शासनाचे अधिकारी शुक्रवारी (ता.१७) येऊन नुकसानीचे पंचनामे करून गेले आहेत. तर, राजपुरी येथील गावामध्ये काही घरांवरील पत्रे उडून गेले. राजपुरी येथील संदीप लोंढे यांच्या नवीन पोल्ट्रीचे काम पूर्ण होत आले होते.
मात्र, पावसामुळे पोल्ट्रीचे संपूर्ण पत्रे तुटले. तर लोखंडी चॅनल पूर्णपणे वाकडे झाले आहेत. काही शेतकऱ्यांचे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, अनेक कुटुंब अडचणीत सापडली आहेत.
बेलज व राजपुरी या भागात पॉलिहाऊस, पोल्ट्री, घरे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या सर्व ठिकाणी पंचनामे झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.