Ranji Trophy 2024 – रणजी करंडक २०२४च्या विजेतेपदाच्या सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. मुंबईने पहिल्या उपांत्य फेरीत तामिळनाडूचा धुव्वा उडवत आधीच थाटात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याचा निकाल ३ दिवसांत लागला. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाने २०२१-२२ च्या चॅम्पियन मध्य प्रदेशला ६२ धावांनी धूळ चारून अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या पाचव्या दिवशी विदर्भ आणि मध्यप्रदेश हे दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देत असताना, विदर्भाला ४ विकेट्सची तर मध्यप्रदेशला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ९३ धावांची गरज होती, पण विदर्भाच्या गोलंदाजांनी मध्य प्रदेशाच्या उर्वरित फलंदाजांना दिवसाच्या सुरूवातीलाच गुंडाळले आणि रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचवले. १० मार्चपासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विदर्भ संघानेही दोनदा २०१७-१८ व २०१८-१९ असे सौराष्ट्राचा पराभव करताना विजेतेपद पटकावले आहे.
महाराजा रणजित सिंग यांच्या नावाने खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडकाचा पहिला हंगाम १९३४-३५ मध्ये झाला. तेव्हापासून मुंबईने ४१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई संघाने भारताला महान सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर ते सध्याचा कर्णधार रोहित शर्मापर्यंत दिग्गज फलंदाज दिले आहेत. या शतकातच मुंबईने ७ जेतेपदे जिंकली आहेत आणि केवळ ६ वेळा विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्याचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी भरलेला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत, तर दुसरीकडे या स्पर्धेत विदर्भाने विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत इथपर्यंत मजल मारली आहे.
अंतिम फेरीत मुंबई केवळ ६ वेळा पराभूत
मुंबईचा संघ आतापर्यंत केवळ ६ वेळा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. १९४८-४९ च्या मोसमात प्रथमच, मुंबई अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विजय मिळवू शकली नाही. त्यानंतर होळकर संघाने त्यांचा ९ गडी राखून पराभव केला. २०२१-२२ च्या मोसमात मुंबई अंतिम फेरीत गेल्यावर पराभूत झाली होती. मुंबईला मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
सर्वाधिक रणजी विजेतेपद
मुंबई- ४१
कर्नाटक/म्हैसूर- ८
दिल्ली-७
मध्य प्रदेश/होळकर-५
बडोदा-५