वडगाव मावळ – मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनपत्र छाननी दरम्यान आयत्यावेळी आलेल्या हरकतीमुळे दोन नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आली. मात्र या संघाद्वारे खरेदी–विक्रीच झाली नसल्याने ही संपूर्ण निवडणुकच बेकायदेशीरित्या होत असल्याची चर्चा मावळातील नागरिकांमध्ये रंगली आहे.
मावळ खरेदी विक्री संघाच्या १९ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. अ वर्गातून जास्त संख्येने जागा असूनही तेथील मतदार संख्या मात्र अत्यंत अल्प असल्याने अ वर्गात मोठी चुरस निर्माण झाली आहे. नामनिर्देशन पत्र भरल्या नंतर छाननी प्रक्रियेत कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विषेश् मगास प्रवर्गातील एक उमेदवारी अर्ज जातीचा दाखला नसल्याच्या कारणास्तव अपात्र करण्यात आला आहे. अ गट अ मधील वडगाव मतदार संघातील एक उमेदवारी अर्ज सूचकाची खरी स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरुन अपात्र ठरविला. अ गटातील टाकवे मतदार संघातील दोन उमेदवारी अर्ज संस्थेने मागील पाच वर्षांमध्ये एकदाही खरेदी विकी केली नसल्याच्या कारणाने अपात्र ठरविण्यात आलेले आहेत.
हे अर्ज अपात्र ठरविताना निवडणूक अधिकारी यांनी असे कारण दिले आहे की, संस्थेचे उपविधी क्रमांक ४० नुसार संस्थेने मागील दोन हंगामात किमान पाच हजार रुपये किंमतीचा शेतमाल विकला पाहिजे किंवा खरेदी केला पाहिजे. तथापि आपल्या अर्जात संस्थेने २०१९ पासून कधीही शेतीसाठी खतांची खरेदी केलेली नाही. तसा दाखल्याची प्रत देखील सोबत जोडलेली आहे. यामुळे संस्थेच्या उपविधीतील तरतुदीचा भंग होत असल्याचे कारण देत नामनिर्देशन पत्र अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
विषेश म्हणजे मावळ खरेदी विक्री संघाच्या मार्फत मागील पाच वर्षांच्या काळात कधीही खते व बी-बियाणे यांची खरेदी विक्री झाला नसल्याचा दाखला देखील संस्थेचे सचिव यांनी दिलेला आहे. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्याचे कारण पाहता सर्वच अर्ज हे अपात्र ठरत असून ही निवडणुकच बेकायदेशीर असल्याची चर्चा मावळतील नागरिकांमध्ये रंगली आहे.
हरकत नाही म्हणून अर्ज वैध
या संदर्भात संबंधित अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, छाननी दरम्यान अर्ज बाद झालेल्या उमेदवरांच्या विरोधात हरकत आल्याने हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. इतरांच्या विरोधात हरकत आली नसल्याने त्यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
न्यायालया जाण्याचा इशारा
उमेदवारी अर्ज अपात्र ठरविलेल्या उमेदवार यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सर्जेराव कांदळकर यांच्याकडे अर्ज अपात्र केल्याच्या विरोधात अपील दाखल केलेले आहे. तेथे न्याय न मिळाल्यास ते न्यायालयात देखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना नियम सारखेच असले पाहिजे अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी घेतली आहे. तसेच अधिकारी वर्गाने नियमांमध्ये असलेल्या तरतूदीचा वापर केल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द होऊ शकते.