पोलीस उपायुक्त सतीश कसबे ः चाकणमध्ये उद्योजकांसोबत वाहतूक, परिवहनची बैठक
औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत
चाकण : वाहनचालकासह पादचार्यांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला वॉर्डन (वाहतूक मदतनीस) औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत, अशी अपेक्षा पोलीस उपायुक्त सतीश कसबे यांनी व्यक्त केली.
चाकण औद्योगिक परिसरामध्ये वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाया जात असून याचा कंपन्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन व वाहतूक विभाग यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, परिवहन आधिकारी अतुल आडे, सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, पोलीस निरीक्षक चौरे, मुकुंद पुराणिक, मर्सिडीजचे मंडपे, संतोष खराबी, प्रकाश धोंगडे, रवी हंगारगे, सिद्धाराम चडचणी, रवी धुतेकर, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष इत्यादी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अतुल आदे यांनी रस्त्यावरील अपघात व त्यात होणारे मृत्यू हा अतिशय गंभीर विषय बनत चालला असून त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी ट्राफिकच्या नियमांची माहिती दिली.
कसबे म्हणाले, अपघात कमी करण्यासाठी प्रवाशांनी व वाहन चालकांनी रहदारीच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू; मात्र पोलीस कमी असल्याने वाहतुकीचे नियमन करण्यामध्ये खूप ताण येतो, अडचणी येतात. त्याकरिता कंपन्यांनी वाहतूक मदतनीस दिले तर आम्हाला काम करणे सोपे होईल व वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले की, फक्त बेशिस्त वाहतूकीमुळे ट्रॅफिक जाम होत नसून मुळात या परिसरात रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात उणीवा आहेत. या परिसराच्या विकासाची गती व वाढती गरज लक्षात घेता राष्ट्रीय रस्ते वाहतूक विभागाने ताबडतोब नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव -चाकण -शिक्रापूर या रस्त्यांचे काम सुरू करणे गरजेचे आहे. जेणेकरून कामगारांना वेळेत पोहोचता येईल व कंपन्यांचे नुकसान होणार नाही व अपघाती मृत्यू सुद्धा वाचतील.
हा परिसर अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात या परिसरातून भारत सरकारला कर दिला जातो. सुमारे 15 लाख कामगार औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहेत. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन या परिसरातील पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. सुरक्षित कामावर जाणे व सुरक्षित घरी पोहोचणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी रहदारीचे नियम पाळावेत. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने त्यांच्या परिसरातील जे चालक वर्षभर अपघात करणार नाहीत त्यांना उत्कृष्ट चालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे असे सुचविले. मंडपे यांनी प्रास्ताविक केले व संतोष खराबी यांनी आभार मानले.
उद्योग इतर राज्यात जाण्याची भीती
दैनंदिन वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडत असल्याने ताण वाहतुकीवर येतो, कामगार वेळेत येऊ शकत नाही, त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन उद्दिष्टांवर परिणाम होऊन नुकसान होते. हे टाळण्यासाठी बर्याच कंपन्यांनी विस्तार शेजारील राज्यांमध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्रा प्रदेश, मध्य प्रदेश केला आहे. याशिवाय काही उद्योग इतरत्र जाण्याचा विचार करीत आहेत.
अपघात होण्यामागे बहुतेक वेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक अशा गोष्टी कारणीभूत आहेत; परंतु या अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या कामगारांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कामगारांनी आपले कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे
-जयंत उमराणीकर, निवृत्त पोलीस महासंचालक