राहुरी -दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुळा धरणकडे पाण्याची आवक अवघ्या 886 क्युसेकने सुरू आहे. जायकवाडीकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात 25 हजार 797 दशलक्ष घनफूट (99.21 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 21297 दशलक्ष घनफूट (99.05 टक्के) इतका आहे. कोतुळ येथे आजपर्यंत 776 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे 972 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुळा धरणाची दोन्ही कालवे बंद आहेत. धरणातून जायकवाडीकडे 3000 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. धरणावर पाऊस थांबल्याने जायकवाडीकडे होणारा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात येणार आहे. 25 हजार 797 दशलक्ष घनफूटच पाणीसाठा कायम ठेवून मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडण्यात येणार आहे.
कोतुळ येथून पाण्याची मोजणी केली जाते. पारनेर भागातून किती पाणी आले याची नोंद नसते. त्यामुळे ठराविक साठा कायम ठेवून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या लाभ व पाणलोट क्षेत्रात आज सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिके वाया गेली.