गोंदवले -“आकाशात सतत घिरट्या घालणारी विमाने अन् सतत कानावर पडणारे सायरनचे आवाज यामुळे आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत होतो. विमानांच्या आवाजाने अक्षरशः अंगाचा थरकाप उडायचा आणि काळजाचे पाणी व्हायचे. युद्ध परिस्थितीमुळे मेस व बाजारपेठा बंद असल्याने मिळेल ते खाऊन बंकरमध्ये दिवस काढण्याशिवाय पर्याय नव्हता. उणे तापमानात करावी लागलेली पायपीट, जीव मुठीत धरून करावा लागलेला प्रवास, कुटुंबीयांशी तुटलेला संपर्क अशा युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात येण्याची आस लागली होती. अखेर केंद्र शासनाच्या सहकार्याने आम्ही आज सुखरूप मायदेशात पोहोचलो.’
माण तालुक्यातील काळचौंडी येथील सौरभ बाळासाहेब जाधव हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी आपले थरारक अनुभव सांगत होता. सौरभ संकटातून बाहेर पडल्यामुळे त्यांच्या पालकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. राज्य व केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत. माध्यमिक शिक्षक बाळासाहेब जाधव यांचा मुलगा सौरभ नोव्हेंबर 2021 पासून युक्रेनमधील लव्हिव शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
रशिया- युक्रेनमध्ये युद्धामध्ये भीतीच्या छायेखाली अडकलेल्या सौरभची मायदेशात परतण्यासाठी धडपड सुरू होती. सौरभ सांगत होता, “आम्ही राहत असलेल्या होस्टेलमध्ये 300 विद्यार्थी आहेत. अनेक दिवस रशिया-युक्रेनमध्ये शीतयुद्ध सुरू होते. युद्धपरिस्थिती गंभीर बनल्याने 18 फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावास कार्यालयाने युक्रेनमधील भारतातील नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही विमान तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु तिकीट मिळत नव्हते. त्यातच रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी हल्ल्या केल्याने विमानसेवा ठप्प झाली.
याचदरम्यान रशियाने हल्ले वाढविल्याने सर्वजण भयभीत झालो. रशियन विमाने आकाशातून घिरट्या घालत असल्याने आमच्या अंगाचा थरकाप उडायचा. विमानाच्या आवाजाने काळजाचे पाणी व्हायचे. सायरनचे मोठे मोठे आवाज करत गाड्या फिरत असल्याने बाहेर पडणे अशक्य होते. बाजारपेठा, दुकाने, कॉलेजची मेस बंद झाल्याने खाण्यापिण्याची चिंता वाढली. कॉलेजच्या बंकरमध्ये विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला. जवळ असलेली बिस्किटे, स्नॅक्स खाऊन प्रसंगी उपाशीपोटी राहून आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून दिवस काढले. बंकरमध्ये काढलेले 36 तास क्षणाक्षणाला मायभूमीची आठवण करून देत होते.”
युद्ध परिस्थितीत भारतीय परराष्ट्र मंत्रालय, दूतावास विभाग यांसह आईवडील, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण संपर्कात राहून मानसिक आधार देत होते, याचदरम्यान भारतीय दुतावासाने भारतीयांनी युक्रेनच्या सीमेपर्यंत येण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी भारतीय विशेष विमानांनी सर्वांना भारतात पोहोचविण्याची सोय केली असल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही लव्हीव ते हंगेरी असा साधारण 70 तासांचा प्रवास करून खासगी बसने हंगेरी गाठली. मात्र, त्यातही आम्हाला दोन दिवस धर्मशाळेत राहून मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागले. त्यानंतर भारतीय दूतावास विभागाने संपर्क करून आम्हाला विशेष विमानाने शुक्रवारी 4 मार्च रोजी दिल्लीत सुखरूप सोडले. केंद्र सरकारने दिल्लीत महाराष्ट्र सदन याठिकाणी आमची राहण्याची सोय केली होती. त्यानंतर दिल्लीहून विमानाने आम्हाला पुण्यात सोडले. युद्धाच्या परिस्थितीतून सुखरूप घरी पोहचल्याने मला आनंद होत असल्याचेही त्याने सांगितले.