श्रीनगर – भारत पाक व्याप्त काश्मीरवरील आपला दावा कधीच सोडणार नाही असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत केले होते. आम्ही व्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी कटीबध्द असल्याचे नूमद करतानाच मात्र त्यासाठी बळाचा प्रयोग करणार नाही असेही राजनाथ यांनी म्हटले होते. तथापि, त्यांच्या या विधानानंतर आता भारतातील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. (“Pakistan Not Wearing Bangles”: Farooq Abdullah Controversial Comments)
राजनाथ यांच्या विधानाबाबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत हे आपण विसरायला नको. तसेच पाकिस्तानने काही बांगड्या घातलेल्या नाहीत अशी टिप्पणी करतानाच त्यांनी कलम ३७० व ३५ (अ) हटवण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवरही टीका केली. ते म्हणाले जर राजनाथ सिंह असे काही म्हणत असतील तर त्यांनी तसे करावे.
आम्ही त्यांना रोखणारे कोण? मात्र त्यांनी हेही ध्यानात ठेवावे की पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत व दुर्दैवाने तो आमच्यावरच पडेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला तणाव ही प्रमुख अडचण आहे व दोन्ही देशांनी परस्परांशी बोलले पाहिजे. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे.
जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही त्यांनी भविष्यवाणी केली. अमरनाथ यात्रा झाल्यानंतर विधानसभा निवडणुका घेतल्या जातील असे ते म्हणाले. पुंछ भागात हवाईदलाच्या तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की प्रदेशातील कलम ३७० रद्द केल्यानंतरही दहशतवादी हल्ले सुरू आहेत.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनीही विधानसभा निवडणुकीचे सूतोवाच केले होते. मात्र त्याचे वेळापत्रक काय असेल याची माहिती त्यांनी दिली नव्हती. तसेच जम्मू काश्मीरमध्येही लष्कराला विशेष अधिकार देणाऱ्या आफ्स्पा कायद्याची आता गरज भासणार नाही असे मतही त्यांनी नोंदवले होते.