मुंबई : महाविकास आघाडीचा महामोर्चा अपयशी ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यभरातून माणसे मोर्चासाठी बोलावण्यात आली होती. अशा वेळी अनेक किलोमीटर लांबीचा हा मोर्चा असायला हवा होता. मैदान पूर्ण भरले गेले पाहिजे होते. मात्र तसे काही झाले नाही अशी टीका फडणवीस यांनी केली. दरम्यान, यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
दरम्यान, मविआ सरकारचा महामोर्चाविषयी बोलताना फडणवीसांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, आझाद मैदानावर येण्याची विनंती आम्ही त्यांना केली होती. मात्र मैदान भरणार नाही याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी निमुळत्या रस्त्याची निवड केली. उध्दव ठाकरेंना मोर्चाचे कोणते विराट स्वरूप दिसले? त्यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा मोर्चाही नॅनो होता. असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.
पुढे बोलताना फडणवीस यांनी,”शिंदे सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल, या संजय राऊत यांच्या विधानावर, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करेलच पण पुढची विधानसभा निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढू व जिंकूदेखील,” असा विश्वास देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवला. तसेच मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले,” अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना, “उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते आहे आणि ती १० वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. कारण, भारताचे संविधान सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत” असेही यावेळी फडणवीस म्हणाले.