मुंबई : राज्यात उद्यापासून नागपूरला विधामंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबचे दर्शन घेतलं. यावेळी केसरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे, अशी साईचरणी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर टीका केली.
दीपक केसरकर यांनी,”शिवसेना खासदार संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट महाराष्ट्रात घडत आहे. त्यांनी वाईट बोललं की चांगलंच होते” असे म्हणत राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत ज्यांच्याबद्दल वाईट बोलले, ती लोकं मोठीचं झाली आहेत. त्यांनी दररोज वाईटच बोलत राहावं, आम्ही आमचं काम चालूच ठेवू असेही केरसकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना केसरकरांनी,”उद्धव साहेबांबद्दल मला आदर आहे. ते आता रस्त्यावर उतरले हे चांगलेच आहे. मात्र, ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं”, असे म्हणत ठाकरेंवर खोचक टीका केली. जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत चेहऱ्यावर मास्क होता. सरकार गेलं मास्क उतरला असं केल्याने जनतेत चुकीचा मेसेज जातो असे केसरकर म्हणाले.
त्याचबरोबर आमच्यासारख्या आमदाराला सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट मिळत नव्हती असे केसरकर म्हणाले. राज्य सक्षमपणे चालवावं लागतं, केंद्राकडे बोट दाखवून चालत नाही. आमचं सरकार नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात आणत असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. समृद्धी महामार्गसारखा रस्ता कोकणात जाण्यासाठी होणार असल्याचे केसरकर म्हणाले.
विरोधी पक्ष हा आंदोलन करतच असतो. विरोधक नागरिकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे केसरकर म्हणाले. हिंदू देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता. इथं मात्र महाराष्ट्र प्रेमी असल्याचं भासवता असे म्हणत केसरकरांनी मविआने काढलेल्या मोर्चावर टीका केली. संतांचा अपमान करणाऱ्यांना बरोबर घेऊन जाताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. आमच्यातील कोणी चुकला, तर आम्ही त्याबद्दल त्याला जाब विचारू, माफी सुद्धा मागायला लावू असे म्हणत थोर महापुरुषांबद्दल नेहमी आदर ठेवला जाईल असे आश्वासन यावेळी केसरकरांनी दिले.