केंद्राच्या दाव्याने स्मार्टसिटीच्या शोधावर प्रश्नचिन्ह
अन्य शहरांत 23 चाचण्यानंतर एक तर पुण्यात नऊमागे एक बाधित
– गायत्री वाजपेयी
पुणे – एका बाजूला पुण्यात करोना वाढीचा वेग मंदावत असल्याचा दावा, स्मार्ट सिटीमार्फत केला जात असतानाच शहरात हा वेग अन्य शहरांच्या तुलनेत खुपच अधिक असल्याचे भीषण वास्तव केंद्रीय पथकाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दाव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. अन्य शहरात 23 चाचण्या केल्यानंतर एक बाधित सापडतो, मात्र पुण्यात हे प्रमाण फक्त नऊ चाचण्यांमागे एक असे आहे.
देशातील चार राज्यांमधील करोना परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक (आयएमसीटी) पाठविण्यात आले होते. नुकतेच या पथकाने राज्यातील मुंबई आणि पुणे या शहरांना भेट देत, येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड, बारामती, स्थलांतरित मजुरांच्या छावण्या, भाजीपाला मार्केट, रेशन दुकाने, जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष आणि हॉस्पिटल्सची पाहणी केली. या पथकाने सादर केलेल्या अहवालाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सोमवारी माहिती देण्यात आली.
या माहितीनुसार, पुण्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा वेग हा 7 दिवसांचा आहे. तसेच, झोपडपट्टी आणि भाजीपाला बाजार व अन्य ठिकाणी सोशल डिस्टंन्सिगचे नियम पाळले जात नाही. आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी, आवश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारे दुकानदार आणि भाजीविक्रेते करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. कारण हे सर्वजण रोज अनेकांच्या संपर्कात येत असतात. यामुळे शहरात अधिकाधिक चाचण्या केल्या पाहिजेत. तसेच, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना लवकर शोधले पाहिजे, असे उपाय केंद्रीय पथकाने सूचवले आहेत.
गेल्या काही दिवसात स्मार्टसिटीतर्फे शहरातील बाधितांची संख्या वाढीचा वेग कमी होत असल्याचा दावा केला जात होता, तो केंद्रीय पथकाच्या माहितीमुळे पोकळ असल्याचे बोलले जात आहे.