नवी दिल्ली : इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी भारतीय व्यावसायिक पद्वतीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना, ‘भारताला समृद्ध होण्यासाठी प्रामाणिक संस्कृतीची गरज ज्यामध्ये पक्षपाताला जागा नसावी.’ असे त्यांनी म्हटले. एवढंच नाही तर मूर्ती यांनी,”भारताला समृद्ध होण्यासाठी जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे.”असे म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉग या कार्यक्रमात मूर्ती यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी ही चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना मूर्ती यांनी,’देशातील केवळ एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो. पंतप्रधानांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती अद्यापही बहुतेक लोकांनी आत्मसात केलेली नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या व्यावसायिक वातावरणावर भाष्य केलं आहे.
मूर्ती यांनी म्हटलं की, ”भारताला एक देश म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रामाणिकपणाची संस्कृती आवश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की, ”भारतात अशी संस्कृती असली पाहिजे जिथे कोणताही पक्षपात न करता झटपट निर्णय घेतले जातील. तसेच व्यवहार प्रामाणिकपणे आणि सहजतेने पूर्ण करता येतील.”
आपल्याला जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं. त्यांनी सांगितलं की, 1940 च्या शेवटी भारत आणि चीन या दोन्ही देशांचा व्यावसायिक आकार समान होता, पण आता चीनचं व्यावसायिक आकारमान भारताच्या आकारमानाच्या सहा पटीने वाढलं आहे, कारण त्यांनी ही संस्कृती आत्मसात केली आहे.