सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने गनिमी कावा करत उदयनराजे भोसले यांना गळाला लावले. खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने आधीच खोलात गेलेल्या राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात गेला.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एका महिन्यातच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, तर उदयनराजेंनी निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी भाजपची वाट धरली. दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी लुळीपांगळी झाल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी हार मानतील ते शरद पवार कसले.
उदयनराजेंनी भाजपकडून लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताच पवारांनी त्यांच्या भात्यातून श्रीनिवास पाटील हे अस्त्र बाहेर काढले. श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी अंतिम मानली जात असून सातारा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा “कॉंटे की टक्कर’ पाहायला मिळेल. राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची, तर भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
यापूर्वी सातारा जिल्ह्यात शरद पवारांनी कोणालाही तिकीट दिले तरी तो उमेदवार निवडून यायचाच. त्याला कारणेही तशीच होती. शरद पवार यांच्यातल्या मातब्बर आणि मुत्सद्दी राजकारण्याने बांधणीच तशी केली होती. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. मोदी लाटेत शरद पवार नावाचं वादळ भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.
2014 मध्ये लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला. यंदा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात “इनकमिंग’ सुरू झाले होते. एकापाठोपाठ एक मातब्बर सेनानी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये डेरेदाखल होत गेले आणि पवारसाहेब हतबल होऊन हे सगळं पाहत राहिले. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जेमतेम चार खासदार राज्यातून निवडून आले. त्यात सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी कडवी लढत देऊनही उदयनराजे सव्वालाखाच्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहिल्याचे चित्र असतानाच लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीला हादरा बसला.
पक्षाकडून तीन वेळा आमदार झालेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज ढासळला. राज्यभरात राष्ट्रवादीतून “आऊटगोईंग’ सुरू असतानाच शिवेंद्रराजेंसारखा हुकमी एक्का राष्ट्रवादीला सोडून गेल्याने जिल्ह्याचे राजकीय गणित बदलले आहे.
उदयनराजेंनी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, तीन महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा दिल्याने उदयनराजेंवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. मात्र, उदयनराजेंनी या टीकेकडे लक्ष न देता लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लक्ष घातले.
उदयनराजे भाजपमध्ये गेल्यावर लोकसभा पोटनिवडणुकीत कोण, हा गहन प्रश्न राष्ट्रवादीला पडला. सलग तिसऱ्या टर्मला राष्ट्रवादीकडून खासदार झालेल्या उदयनराजेंपुढे कोणाचा टिकाव लागणार, याची चर्चा रंगू लागली. त्यावर दस्तुरखुद्द शरद पवार लढणार, अशी चर्चा झडू लागली; पण ज्या पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती, त्या पवारांचा राजेंच्या साताऱ्यात टिकाव लागणार का, हा प्रश्नही महत्त्वाचा होता.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे सुपुत्र सारंग पाटील ही नावे पुढे येत राहिली. अखेर उदयनराजेंना शह देण्यासाठी पवारसाहेबांनी श्रीनिवास पाटील नावाचे अस्त्र ऐनवेळी बाहेर काढले असून त्यांचे नाव अंतिम झाल्यात जमा आहे.
भाजपकडून उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीकडून जुन्या जाणत्या आणि ग्रामीण भागात लोकप्रिय असणाऱ्या श्रीनिवास पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे पाटील यांच्यात रंगतदार आणि प्रतिष्ठेची लढत राज्याला पहायला मिळणार आहे.
भाजपने मोक्याच्या क्षणी गनिमी कावा केल्याने राष्ट्रवादीची उमेदवार निवडताना दमछाक झाल्याचे पहायला मिळाले; पण ऐनवेळी “कॉंटे की टक्कर’ देणारा उमेदवार राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरवला जाणार, ही शक्यता खरी ठरली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात सलग तीन टर्म (2019 मधील तीन महिने) लोकांनी उदयनराजेंना उचलून धरले.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेल्या नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना कडवी लढत दिली. मताधिक्य कमी झाल्याने उदयनराजे नाराज झाले; पण त्याला कारणेही तशीच आहेत. निकालानंतर प्रामुख्याने विकासकामांचा मुद्दा चर्चिला गेला. मताधिक्य कमी झाले, पण उदयनराजे खासदार झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी राजीनामा दिला आणि ते भाजपवासी झाल्याने लोकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे चित्र आहे. त्याचा प्रत्यय सोशल मीडियावर येत आहे.
असे असले तरी, धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेले उदयनराजे ही नाराजी दूर करतील आणि पुन्हा मताधिक्य मिळवून खासदार होतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. दुसरीकडे विश्वासघात करणाऱ्या उदयनराजेंचा विजयरथ काहीही करुन रोखायचा, असा विडा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह अगदी सामान्य कार्यकर्त्यांनीही उचलल्याचे अनेक उदाहरणांवरुन पहायला मिळत आहे. उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या काही तास आधीच राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाटलांचा डीपी अनेक सोशल मीडिया अकाऊंटस्वर दिसू लागला. एकूणच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार, यात शंका नाही.
संपूर्ण राज्याचे लक्ष
उदयनराजेंची लोकप्रियता, शिवेंद्रराजे आणि मोदी लाट यावर भाजपची मदार आहे, तर ऐन युद्धात एकटे पडलेल्या शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूतीची लाट यावर राष्ट्रवादीची मदार आहे. एकंदरीत लोकसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी “करो या मरो’ अशी आहे, तर काहीही करून पुन्हा एकदा खासदार व्हायचंच यासाठी उदयनराजेंना कष्ट घ्यावे लागणार आहेत. एकीकडे उदयनराजेंची तर दुसरीकडे राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली असून या “हाय व्होल्टेज’ लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.