पिंपरी – अंगणवाडी सेविका त्यांना मानधन ऐवजी वेतन द्यावं म्हणून चार डिसेंबर पासून संपावर आहेत. त्यांच्या अंगणवाडीला म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला दोन वर्षांनी ५० वर्षे पूर्ण होतील. तरी त्या अजून मानधनावरच आहेत. पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यापासून ते आरोग्य, पूरक पोषक आहार देणे इत्यादी मानवी विकासाचे काम त्या करत आहेत. कोणालाही त्याने केलेल्या कामाचा मोबदला न देणे किंवा कमी देणे म्हणजे भ्रष्टाचारच आहे, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केले. या कर्मचाऱ्यांना वेतन देऊन भ्रष्टाचार दूर करावा अशी मागणी पवार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली.
अंगणवाडी कर्मचारी सभेने खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या शासनाकडे पोचविण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावेळी पिंपरी चिंचवड प्रतिनिधी शैलजा चौधरी यांच्यासह शेकडोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतीस उपस्थित होत्या. या वेळी पवार बोलत होते.
त्यावर लोकसभेत आवाज उठवण्याबरोबरच केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी, राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना आपण पत्र लिहू. तसेच त्यांची समक्ष भेटे घेऊन प्रश्न मांडू असे आश्वासन बारणे यांनी आंदोलकांना दिले.
दरम्यान तळवडे येथे झालेल्या भीषण अग्निकांडात सहा महिलांचा मृत्यू झाला आणि काही गंभीर जखमी आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि बेफिकिरे मुळे झालेल्या या जळीतकांडाचा निषेध म्हणून अंगणवाडीसेविकांनी काळ्या फिती लावून डांगे चौकात निदर्शने केली. मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेने केली आहे.