Women’s Cricket (India vs Bangladesh, 5th T20 Match ) : बांगलादेशमध्ये 2024 च्या अखेरीस महिला T20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे आणि त्याआधी, भारतीय महिला संघाने बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना 21 धावांनी जिंकत मालिका 5-0 ने खिशात घातली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय महिला संघाने पाचव्यांदा कोणत्याही संघाविरुद्ध मालिका क्लीन स्वीप केली आहे, तर तिसऱ्यांदा बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला आहे.
सिल्हेटच्या मैदानावर गुरूवारी खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या महिला संघाला 20 षटकांत 6 बाद 136 धावांपर्यंत मजल मारता आली.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎! 🙌
Congratulations to #TeamIndia on winning the #BANvIND T20I series 5⃣-0⃣👏👏 pic.twitter.com/YTnEYKuOpm
— BCCI Women (@BCCIWomen) May 9, 2024
या सामन्यात 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशच्या महिला संघाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही, ज्यात 19 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली तर लगेचच 26 धावांवर संघाला दुसरा धक्का दिलारा अख्तरच्या रूपाने बसला. या सामन्यात 52 धावसंख्येवरच बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता, त्यानंतर शोरिफा खातून आणि रितू मोनी यांनी डावाची धुरा सांभाळत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली पण दोन्ही खेळाडूंना झटपट धावा करण्यात यश आले नाही. शोरिफा खातूनने नाबाद 28 तर रितू मोनीने 37 धावांची खेळी केली.
भारतीय महिला संघाच्या वतीने राधा यादव आणि आशा शोभना यांनी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली, ज्यात राधाने 4 षटकात 24 धावा देत 3 विकेट्स तर आशाने 4 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेण्यात यश मिळवले. तितास साधुलाही एक यश मिळाले. तिने 4 षटकात 27 धावा दिल्या.
तत्पूर्वी, भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाीजाचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. स्मृती मंधाना हीने 33 धावा जोडल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 धावा केल्या. तर सलामीवीर शफाली वर्मा 14 धावांवर बाद झाली. एस संजनाने 1 धाव जोडली. तर रिचा घोष आणि दीप्ती शर्मा ही जोडी नाबाद परतली. दीप्तीने 5 आणि रिचाने 17 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा जोडल्या.
बांगलादेशकडून राबिया खान आणि नाहिदा अक्टर या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. राबियाने 4 षटकात 28 तर नाहिदाने 4 षटकात 27 धावा दिल्या तर सुल्ताना खातून हीने 3 षटकात 26 धावा देत 1 विकेट घेतली.
राधा यादवला मिळाला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार….
राधा यादवने पाचव्या T20 सामन्यात तीन विकेट घेत विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यासाठी तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय तिला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. तिने 5 सामन्यात 9.60 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. याशिवाय दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनीही प्रत्येकी 5 बळी घेतले. स्मृती मंधानाने या मालिकेत फलंदाजी करताना 116 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरही एकूण 104 धावा करण्यात यशस्वी ठरली.