नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून पी -नोट्स मधून गुंतवणूक थंडावल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष आकडेवारीनुसार सध्या पी -नोट्सच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 1.5 लाख कोटी रुपयांवर गेली. गेल्या सहा वर्षात प्रथमच ही गुंतवणूक इतक्या उच्च पातळीवर गेली असल्याचे समजले जाते.
या गुंतवणुकीत शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीबरोबरच कर्जरोखे बाजारात आणि हायब्रीड बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे. परदेशातील ज्या गुंतवणूकदारांना भारतात थेट गुंतवणूक करायची नाही असे लोक पी नोट्सच्या माध्यमातून ही गुंतवणूक करीत असतात. मात्र त्यांना केवायसी करणे गरजेचे आहे.
फेब्रुवारी अखेरीस उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार पी -नोट्सच्या माध्यमातून भारतातील विविध बाजारात झालेले गुंतवणूक 1.5 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही गुंतवणूक 1.43 लाख कोटी रुपये होती. जून 2017 मध्ये पी -नोट्सच्या माध्यमातून भारतात झालेली गुंतवणूक सर्वोच्च म्हणजे 1.65 लाख कोटी रुपयांवर गेली होती.
जागतिक बाजारात जर जोखीम वाढली तर भारतीय बाजारात पी -नोट्सच्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असते. जागतिक बाजारात जोखीम कमी असल्यानंतर भारतीय बाजारात गुंतवणूक कमी होते. सध्या जागतिक बाजारात अनिश्चित वातावरण आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत.
कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक
भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असण्याबरोबरच भारतीय कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूक वाढली असल्याचे दिसून येते. 1.5 लाख कोटी रुपयांपैकी 1.27 लाख कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवण्यात आले आहेत. तर 21,000 कोटी रुपये कर्जरोखे बाजारात गुंतवण्यात आले आहेत. 541 कोटी रुपये हायब्रीड सिक्युरिटीज या क्षेत्रात गुंतविण्यात आले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली एकूण गुंतवणूक 68.55 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.